भूपतगड-प्राचीन पहारेकरी

भूपतगड-प्राचीन पहारेकरी
-ओंकार ओक

भूपतगड-प्राचीन पहारेकरी
. . . . .

ठाणे जिल्हा म्हणजे वैविध्यतेने समृद्ध अशा गडकोटांची खाणच !! केळवे-माहीमसारख्या निसर्गरम्य सागरी किल्ल्यांपासून ते अशेरी, कोहोज, तांदूळवाडीसारख्या बलदंड आणि राकट गिरीदुर्गापर्यंत अनेक सुंदर किल्ले ठाणे जिल्ह्याच्या नकाशावर आहेत. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्‍यातील एक नितांत सुंदर ठिकाण !! खरं तर जव्हार हे पर्यटकांसीठीचं ""हिल स्टेशन'' असलं तरी इथल्या मुकणे राजवाड्यामुळे जव्हारला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. याच जव्हारपासून फक्त 16 किलोमीटर्स वर एक अतिशय दूर्गम पण नितांतसुंदर असा गिरीदुर्ग वसला आहे... त्याचं नाव भूपतगड. जव्हारला भेट देणाऱ्या अनेकांना इतक्‍या जवळ एक किल्ला आहे याची कल्पनादेखील नसल्याने भूपतगड मात्र ट्रेकर्सच्या नकाशावरून काहीसा अदृश्‍यच झाला आहे. पण भूपतगडाचं स्थान पाहिल्यावर मात्र त्याचं भौगोलीक महत्त्व पटल्याशिवाय राहात नाही.
भूपतगडाला भेट देण्यासाठी आपल्याला प्रथम जव्हार गाठावे लागते. जव्हारला जाण्यासाठी अनेक मार्ग असून त्यातील प्रचलित दोन मार्ग प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे कल्याण-कसारा-विहीगाव-मोखाडामार्गे आपल्याला जव्हारला जाता येतं. दुसरा मार्ग हा ठाणे जिल्ह्यातून असून कमालीचा निसर्गरम्य आहे. कल्याण-भिवंडी-वाडा-विक्रमगड-जव्हार हा साधारण शंभर किलोमीटर्सचा प्रवास त्याच्या शब्दातीत अशा हिरव्यागार सौंदर्यामुळे आणि वाटेवर असणाऱ्या खास कोकणी पाड्यांच्या सानिध्यामुळे अतिशय सुखावह ठरतो. जव्हारवरून चोथ्याचा पाडा, केळीचा पाडा, पवारपाडा अशी छोटी आदिवासी गावे पार करत आपण 16 किलोमीटर्सवरील झाप गावात येऊन दाखल व्हायचं. जव्हारहून झापला दर तासाभराने एसटीची देखील व्यवस्था आहे. भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या अगदी जवळ जाईपर्यंत किल्ला आपल्याला दिसत नाही. जव्हार परिसरातील डोंगर रचना अतिशय क्‍लिष्ट !! ठळकपणे दाखवता येईल असा आकार इथल्या एकाही डोंगराला नाही. त्यामुळे झापवरून आपण भूपतगडाच्या पायथ्याला वसलेल्या चिंचपाड्याची दिशा विचारायची आणि किल्ल्याकडे कूच करायचं. चिंचपाड्याहून भूपतच्या पहिल्या पठारापर्यंत जीप जाईल असा कच्चा रस्ता तयार झाला असून इथे एक झेंडा लावलेला आहे. झेंड्याच्या शेजारी असणाऱ्या व पाषाणात कोरलेल्या पावलांना स्थानिक ग्रामस्थ ""सीतेची पावले'' म्हणतात !! का ?? याचं उत्तर त्यांनाही माहीत नाही !! मग एखादा बुजूर्ग भूपतगडाची नाळ थेट रामायणाशी जोडून मोकळा होतो !! सीतेची पावले ज्या छोटेखानी पठारावर आहेत तिथे एक झाप असून इथून समोरच आपल्याला दिसतो गर्द झाडीने भरलेला भूपतगड !! त्याच्या माथ्याच्या दिशेने सरकलेली ठसठसीत पायवाटही नजरेत भरते आणि आपली मार्गक्रमणा सुरू होते भूपतगडाच्या दिशेने.
सीतेच्या पावलांपासून भूपतगडाचा माथा फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर असून ही संपूर्ण पायवाट व्यवस्थित मळलेली असून गर्द झाडीने भरली आहे. या वाटेवरची किर्र शांतता मात्र अनुभवण्यासारखी !! इथल्या निशब्दतेलाही एक आवाज असल्याचा भास होऊन जातो !! वीस मिनिटांच्या थंडगार चालीनंतर भूपतगडाच्या पडलेल्या तटबंदीतून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. किल्ल्याच्या माथ्यावर पाऊल ठेवलं की उजवीकडे जाणारी पायवाट पकडायची. उजवीकडे लगेचच आपल्याला किल्ल्याच्या भग्न दरवाजाचे अवशेष आणि त्यातून किल्ल्याच्या माथ्याकडे येणाऱ्या पायऱ्या दृष्टीस पडतात. हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशमार्ग असून तो पडलेल्या अवस्थेत आहे. आपण फुटलेल्या तटबंदीवरून गडावर प्रवेश केल्याने हा मूळ मार्ग बघून किल्ल्याच्या फेरीला निघायचं. या पायवाटेने पुढे गेल्यावर लगेचच समोर गडावरील मारुतीचे ठाणे आहे. मारुतीचे मंदिर बघून पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याची वाट आपल्याला दिसते. गडाच्या या सर्वोच्च माथ्याला चारही बाजूंनी तटबंदी असून त्याचा एक बुरुज आजही सुस्थितीत उभा आहे. गडाच्या या बुरुजावर स्थानिकांनी झेंडा उभारलेला असून त्या संपूर्ण तटबंदीला स्थानिक ग्रामस्थांनी राजवाडा असे नाव बहाल केले आहे. आपण या राजवाड्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे उत्तरेकडे बाहेर पडलो की, लगेचच उजवीकडे झाडीत एक छोटीशी विहीर व त्याच्या प्रवेशासाठी असलेली कमान आहे. सध्या ही विहीर झाडांनी भरलेली असून त्यात उतरता येत नाही. भूपतगडाच्या या उत्तरेकडील बाजूस एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत.
भूपतगडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे भौगोलीक स्थान !! त्र्यंबक ते जव्हार या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी भूपतगडाची निर्मिती करण्यात आली, हे त्यावरून दिसणाऱ्या विस्तृत प्रदेशावरून आपल्या लगेच लक्षात येतं. भूपतला येण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील कुर्लोट गावामार्गेही वाट असून इथून गडावर येण्यासाठी तब्बल दीड तासाची खडी चढाई असल्याने आपण आलेला झाप गावाचा मार्ग अतिशय सोयीस्कर व सोपा असून इथून फक्त वीस मिनिटांत आपण गडावर येऊन दाखल होतो. भूपतगडाची उत्तर बाजू पाहून झाली की आता निघायचं गडाच्या दक्षिणेकडे !! भूपतगडाची ही बाजू त्याचा पाणीसाठा सांभाळणारी. या बाजूच्या पठारावर जोडटाक्‍यांचा एक समूह असून पाणी अडविण्यासाठी त्याला भिंतही बांधलेली दिसते. या टाक्‍यांच्या खालच्याच बाजूला एक तलाव असून त्याच्या काठावरही आपल्याला पाणी अडवण्यासाठी भिंतीची रचना केलेली दिसते. सध्या मात्र या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसून टाकी समूहातील एकाच टाक्‍याचे पाणी पिण्यायोग्य आहे. भूपतच्या दक्षिण कड्यावर तुरळक तटबंदी सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत. मात्र इथून गडाचा विस्तार नजरेत भरतो !! हवा स्वच्छ असेल तर भूपतच्या माथ्यावरून उत्तरेकडे त्र्यंबक रांग सहज दृष्टीस पडते. सरत्या पावसाळ्यात या भूपतगडाचं आणि आजूबाजूच्या आसमंताचं रूप शब्दातीत होत असणार हे नक्की !! सोनकीच्या फुलांनी सजलेलं भूपतचं पठार आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारा पिंजल नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण मुलुख, सूर्यमाळचे पठार, खोडाळ्याचा प्रदेश हा भाग म्हणजे डोळ्यासाठी जणू पर्वणीच !! त्यामुळे सप्टेंबर-ऑक्‍टोबरच्या काळात पुन्हा एकदा भूपतच्या भेटीला येण्याचं आश्‍वासन त्याला द्यायचं आणि एक अतिशय आडवाटेवरचा सुरेख किल्ला पाहिल्याचं समाधान उराशी बाळगून भूपतगडाचा निरोप घ्यायचा. किल्ल्यावर बाकी कोणतेही अवशेष नसून तासाभरात आपली गडफेरी व्यवस्थित आटोपते. पायथ्याशी आलो. भूपतचा शांत आणि निवांत आसमंत पुन्हा पुन्हा खुणवत राहतो आणि आपला रविवार सार्थकी लागल्याची प्रसन्न जाणीव करून देतो, हे मात्र नक्की !!! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटक्यांची ब्लॉगर यादी

Goa

Esahity pratishtan, ई साहित्य प्रतिष्ठान